दहेगाव खुर्दच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी रोज चार किलोमीटर पायपीट; एसटी सेवा सुरू करण्याची मागणी
अंबड/प्रतिनिधी/ राज्य शासन मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करत असताना अंबड तालुक्यातील दहेगाव खुर्द येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मात्र आजही शिक्षणासाठी रोज तिन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.गावात थेट एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने पाचवी ते बारावीपर्यंत अंबड व ताडहादगांव येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
अंबड आगाराची अंबड – सिद्धेश्वर पिंपळगाव ही बस ताडहादगाव स्टँप व बनगाव स्टँप मार्गे सिद्धेश्वर पिंपळगाव येथे जाते.विशेष म्हणजे, बनगाव स्टँपपासून दहेगाव खुर्द हे गाव अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. मात्र,बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना रोज पायी प्रवास करून बस पकडावी लागते. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थिनींना बसत आहे.
गावातील पालकांनी सांगितले की,अनेक मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते.वाहतुकीची सोय नसल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेषतः पावसाळा,उन्हाळा आणि हिवाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांची ही पायपीट अधिकच त्रासदायक ठरते.
दरम्यान,काही दिवसांपूर्वी गावातील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा अंबड येथे पोलीस भरती प्रशिक्षण घेत असताना दगडाच्या खदानीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या मुलींना शिक्षणासाठी गावाबाहेर पाठवताना अनेक पालक साशंक झाले आहेत.त्यामुळे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित आणि नियमित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,जर अंबड – सिद्धेश्वर पिंपळगाव बसची फेरी दहेगाव खुर्दपर्यंत वाढविण्यात आली किंवा गावासाठी स्वतंत्र बस सेवा सुरू करण्यात आली,तर शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळेल आणि मुलींच्या शिक्षणालाही चालना मिळेल.