अंजना नदीवरील फुलाच्या वादातून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू नातेवाईकांचा संताप
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शफेपूर येथील कृष्णा विठ्ठल मोकासे (वय ६५) यांनी २२ जुलै रोजी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी (२९ जुलै) पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मोकासे यांच्या निधनानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी शव ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच पिशोर पोलीस ठाण्यासमोर सकाळी ९ वाजता जोरदार निषेध करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी लावून धरली. मयत शेतकऱ्याचा मुलगा हर्षल मोकासे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, संबंधित ठेकेदार तसेच महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.नातेवाईकांनी दिलेल्या निवेदनात संबंधित ठेकेदाराने मोकासे यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत ते मागे घेण्याची स्पष्ट मागणी केली. पिशोर पोलीस ठाण्याचे एपीआय शिवाजी नागवे यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती चौकशी करून दोन-चार दिवसांत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तणावग्रस्त वातावरण काहीसे निवळले. नातेवाईकांनी यावेळी पोलिसांच्या समजूतदार व समुपदेशनात्मक भूमिकेचे कौतुक केले.दुपारी ११ वाजता शफेपूर येथील स्मशानभूमीत मोकासे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.या घटनेने संपूर्ण पिशोर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांतून दोषींवर कठोर कारवाई व अंजना नदीवरील पुलाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याने आपले प्राण गमावले, असा आरोप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.