Wednesday, April 29, 2026
Homeऔरंगाबादबुद्धजयंतीच्या निमित्याने

बुद्धजयंतीच्या निमित्याने

बुद्धजयंतीच्या निमित्याने

         आज दि. एक मेला महाराष्ट्र दिन आहे व हाच दिवस कामगार दिवस म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. असे असतांना यावर्षी बऱ्याच दिवसांनंतर बुद्ध पौर्णिमा यावर्षी आली.
         बुद्ध जयंती….. का साजरी केली जाते बुद्ध जयंती? त्याचं उत्तर आहे, तथागतांनी केलेलं कार्य. जग आजही हिंसेच्याच मार्गानं चाललेलं असून गत काही दिवसापुर्वी अमेरिका व इराण युद्धात आपण पाहिलं. त्यानुसार अनेक सैनिक, जे निरपराध होते. ते होळपळून निघाले. अनेक निरपराध माणसं मरण पावलीत. जीवीतहानी सोबत वित्तहानीही झाली. त्यामूळे अशी हानी होवू नये म्हणून सर्व लोकं सुधारावीत म्हणूनच बुद्धजयंतीचं प्रयोजन. कदाचित त्यापासून बोध घेवून तरी लोकं सुधरतील व युद्धापासून परावृत्त होतील. युद्ध करणार नाहीत.
         केव्हापासून साजरी केली जाते बुद्धजयंती? त्याचंही उत्तर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म घेण्यापुर्वी त्यांच्याच अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्धजयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांतील वकील, शिक्षीत वर्ग, काही प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. सन १९५१ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. त्यानंतर १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. ही झाली दिल्लीची गोष्ट. महाराष्ट्रातही दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. त्यानंतर १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले.
         दुःख……. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
           सुरुवातीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धम्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी अर्थात ज्ञान प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार सत्यांचा साक्षात्कार झाला.
          जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या सत्याची जाणीव झाली. त्यातच दुःख कशामुळे उत्पन्न होते? यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता मग भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे सत्यही त्यांना कळून आले.
          हे जरी खरं असलं तरी बौद्ध व तत्कालीन काळात अस्तित्वात असलेला वैदिक धर्म यात थोडासा फरक नाही तर बराच फरक आहे. वैदिक धर्म हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवत होता व एक तत्व प्रतिपादन करीत होता की माणसाच्या जन्मानंतर येणारे भोग, संकटे दुःख ही त्याच्या पुर्वजन्मातील बऱ्यावाईट कर्मानुसार येत असतात. परंतु त्या गोष्टी बौद्ध धम्मानं खोडल्या. बौद्ध धम्मानं सांगीतलं की जन्म हा काही पुनर्जन्मावर आधारीत नाही. ज्या जन्मात माणसाचा जन्म होतो, त्याच जन्मात जर वाईट कर्म केले. करीत राहिलो, तर त्याचे फळ हे वाईटच मिळेल. ज्यातून दुःख येईल. जर आपण त्याच जन्मात चांगले कर्म केले तर त्याचे फळंही चांगलेच मिळेल. वाईट मिळणार नाही. हे जन्ममरणाचे रहाटगाडगे आपल्या याच जन्माच्या बऱ्यावाईट कर्मावर चालते. पुनर्जन्मावर चालत नाही.
         काही लोकं मानतात की मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता. शिवाय या दिवशी जी सजावट केली जाते. त्यात अंधश्रद्धाही आणली जाते. म्हटलं जाते की तथागतांना ज्ञानप्राप्ती अलगद झाली. त्यावेळेस चमत्कार झाला. परंतु खरं सांगायचं म्हणजे बौद्ध धम्म हा चमत्कार मानतच नाही. अंधश्रद्धा पाळत नाही. हा धम्म वास्तविकतेला जास्त महत्व देतो. सदाचाराला हा धम्म जास्त महत्व व स्थान देतो. शिवाय प्रतिपादन करतो की हिंसा करु नये. अहिंसेने जगा. एवढंच नाही तर माणूस जरी वाईट असेल, तरी तो आपल्या चांगल्या कर्मानं बदलू शकतो. इतरांना बदलवू शकतो आणि हे परीवर्तन बुद्ध धम्माने चमत्काराने वा बुवाबाजीने नाही तर केवळ दृढनिश्चयाने व विचाराने करुन दाखवले. तेव्हाच अंगुलीमालचा अहिंसक बनला आणि आम्रपाली नावाच्या वेश्येची तपस्वी आम्रपाली. अशी बरीचशी दरोडेखोर मंडळी, व्याभिचारी मंडळी बौद्ध धम्मानं बदलवली आणि त्यांच्याच माणूसकी भरली. ज्यातून तत्कालीन काळात बौद्ध धम्म वाढला. एवढा वाढला की त्याची पाळेमुळे जगात पसरली व जगाने आनंदाने बौद्ध धम्माचा स्विकार केला.
         आज जगाने बौद्ध धम्म स्विकारण्याची गरज आहे. युद्धाने होळपळून मरणारी निरपराध माणसं पाहता बौद्ध तत्वज्ञान अंगीकारण्याची गरज आहे. जर तसं झालं नाही तर प्रत्येक माणूस दुःखी होणार. हे सत्य आहे. युद्धातून काहीच साकार होत नाही. हेच सांगून गेले बुद्ध. कारण युद्धानं चांगले चांगले राजवंश संपवलेत. ज्या ब्रिटिशांचा सुर्य जगात मावळत नव्हता. ते ब्रिटिश संपलेत आपल्या आक्रमक युद्धनीतीनं. तसंच जी मोगली सत्ता स्वतःच्या सत्तेला आलमवीर बनविण्याची स्वप्न पाहात होती. ती आता कुठेच दिसत नाही. एवढंच नाही तर या भारतात असलेले पुरातन काळातील राजवंश, चोल, चालुक्य, परमार, चंदेल, होयसळ, वर्धन, गुप्त, मौर्य घराणे आज अजिबात दिसत नाहीत. हे सर्व युद्धामुळं घडलं. म्हणूनच आजच्या काळात युद्ध नको तर बुद्ध तत्वज्ञान हवे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
         अंकुश शिंगाडे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments