जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या (मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी) शाळा पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात भरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार,शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये १५ जूनपासून शाळा नियमित सुरू झाल्या असल्या तरी अल्प पर्जन्यमानामुळे उन्हाचा कडाका कायम आहे. विद्यार्थ्यांना उष्माघात व इतर आरोग्यविषयक त्रास होऊ नये,यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील सर्व शाळांचे अध्यापन सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहे.शाळा व्यवस्थापन,मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतला असून,उष्णतेची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील आदेश जारी करण्यात येणार आहेत.