संधिवात हा केवळ सांधेदुखी नाही, तर ‘ऑटोइम्युनो’ आजार; नियमित उपचारच ठरेल प्रभावी!
डॉ. प्रकाश पायमोडे यांचे प्रतिपादन; जालना रोडवरील शिबिरात १०० रुग्णांची तपासणी
छत्रपती संभाजीनगर: संधिवात हा आजार केवळ सांधेदुखीपुरता मर्यादित नसून तो एक ऑटोइम्युनो (स्व-प्रतिरक्षा) विकार आहे. मधुमेह किंवा रक्तदाबाप्रमाणेच यावरही नियमित आणि दीर्घकालीन शास्त्रीय उपचार घेणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध संधिवात तज्ज्ञ डॉ. प्रकाश पायमोडे यांनी व्यक्त केले.
सेव्हन हिल परिसरातील ‘पायमोडे संधिवात क्लिनिक’ येथे आयोजित मोफत रोग निदान व जनजागृती शिबिरात ते बोलत होते. यावेळी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे १०० रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
काय म्हणाले डॉ. पायमोडे?
डॉ. पायमोडे यांनी संधिवाताचे गांभीर्य स्पष्ट करताना खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
-
चुकीची रोगप्रतिकारक शक्ती: जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच पेशींवर हल्ला करते, तेव्हा संधिवात उद्भवतो.
-
अवयवांवर परिणाम: वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार सांध्यांपुरता मर्यादित न राहता मेंदू, मूत्रपिंड (किडनी) आणि हृदयावरही गंभीर परिणाम करू शकतो.
-
पेनकिलर्स टाळा: केवळ वेदनाशामक गोळ्या घेतल्याने तात्पुरता आराम मिळतो, पण आजार मुळापासून बरा होत नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने ‘डिसीज मॉडिफाईंग’ औषधे घेणे गरजेचे आहे.
-
सामान्य जीवन शक्य: योग्य निदानानंतर नियमित औषधोपचार घेतल्यास रुग्ण मधुमेह किंवा थायरॉईडच्या रुग्णांप्रमाणेच वेदनामुक्त आणि सक्रिय आयुष्य जगू शकतो.
शिबिराची वैशिष्ट्ये:
या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. ऋतुजा, अर्जुन नगरे, सागर मगर, सानवी, मुसाकदिक आणि अनिकेत पटवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
