मनरेगा बचाव संग्रामा मध्ये सामील व्हा – काँग्रेसचे खासदार डॉ.कल्याण काळे
जालना/प्रतिनिधी/ शनिवार रोजी जालना येथील संपर्क कार्यालयात जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशात राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) बचाओ संग्राम बाबत व्यापक माहिती दिली.सदरील आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण जनतेसाठी जीवनवाहिनी आहे.या योजनेमुळे लाखो कुटुंबांना रोजगार, आर्थिक आधार व सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे.मात्र अलीकडे मनरेगा योजनेतील तरतुदींमध्ये केंद्र सरकारने अन्यायकारक बदल केले व सदरील योजनेचे नावही बदलून VB-G RAM G केलेले आहे.सदरील योजनेचा मूळ उद्देश ग्रामीण भागातील मजुरांना काम करण्यासाठी त्यांचे संवैधानिक अधिकार सुनिश्चित करत होते परंतु केंद्र सरकारने असे कोणतेही अधिकार ग्रामपंचायत व मजुरांना ठेवलेले नाही.पहिले प्रत्येक परिवाराला कमीत कमी १०० दिवसाच्या रोजगाराची कायद्याने हमी होती आता नवीन कायद्यानुसार अशी कायद्याने कोणतीही हमी नाही तसेच ग्रामपंचायतींना प्रत्येक गावात गावांच्या विकासासाठी कामे मिळत होती.परंतु आता नवीन कायद्यानुसार सरकार ठरवील त्याच ग्रामपंचायतींना व सरकारने ठरवलेली कामे मंजूर होतील.मजुरांना कायद्याने ठरलेली मजुरी मिळत होती परंतु आता सरकार ठरवील त्याच दराने मजुरी मिळेल.पहिले संपूर्ण योजनेच्या कामातील मजुरी केंद्र सरकार राज्यांना देत होते परंतु आता राज्यांचा सदरील योजनेत ४०% वाटा राहणार आहे व केंद्र सरकारचा वाट ६०% राहणार आहे. त्यामुळे राज्यांवर ह्या निधीचा अधिकच बोजा पडणार आहे व आर्थिक संकटात सापडलेली राज्ये ह्या योजनेतील कामांच्या शिफारसी केंद्र सरकारकडे करणार नाहीत त्यामुळे आपसूक सदरील योजना बंद करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचे लक्षात येत आहे या पार्श्वभूमीवर मनरेगा बचाव संग्राम राबविणे अत्यावश्यक असल्याचे मत मा.खासदार महोदयांनी व्यक्त केले. मनरेगा कमकुवत झाल्यास ग्रामीण बेरोजगारी वाढेल,स्थलांतर वाढेल व ग्रामविकासाला मोठा फटका बसेल,अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.