कलीच्या प्रभावापासून बचावासाठी देवाचे नामस्मरण गरजेचे – प.पु. रामदास महाराज आचार्य
जालना/ कलियुगात कली म्हणजे कोण, तर जी पापकर्मे आहेत, वाईट कामे, अनैतिक बी अशा सगळ्या दुष्कर्मांचा कारक हाच कली आहे. अशा दुष्कर्मांना प्रोत्साहन देऊन माणसांना त्यात गुरफटून ठेवणे,असत्संगाशी संग करून, वेळप्रसंगी माणसाची मोठी हानी करणे, किंबहुना माणसाला संपविण्याचे काम हाच कली करतो. त्यामुळे कलीपासून बचावासाठी देवाचे नामस्मरण हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन येथील आनंदवाडी श्रीराम मंदिरांचे संचालक प.पु. रामदास महाराज आचार्य यांनी योगेश्वरी कॉलनीतील श्रीमद् भागवत कथा सप्ताह समाप्तीच्या दिवशी केले. दि. २८ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या सप्ताहाची सांगता दि.३ जानेवारी रोजी झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रामदास महाराजांनी रामायण, महाभारतातील वेगवेगळी उदाहरणे देऊन चांगल्या आणि वाईट बाबी कशा ओळखाव्यात हे पटवून दिले. ठराविक वेळ आल्याशिवाय मनुष्य सत्संगाला आपलंसं करीत नाही,असे सांगून, चांगल्या आचारांबरोबरच चांगले विचार हेच माणसाला प्रगतीकडे नेतात, वाईटाचा पूर्णपणें त्याग करून माणसाने सत्कर्माची कास धरावी, असेही आवाहन रामदास महाराज आचार्य यांनी यावेळी केले. याप्रसंगी सप्ताहाचे आयोजक मोहिनीराज कुलकर्णी यांनी रामदास महाराज यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी कल्याण महाराज आचार्य, श्री. मुळे,रवि कुलकर्णी, डोणगावकर यांच्यासह भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
