जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते
राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
- रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ
जालना :- जिल्ह्यात राज्य रस्ता सुरक्षा अभियान 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरुकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2026 च्या शुभारंभानिमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे 1 जानेवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते. रस्ता सुरक्षा अभियान-2026 च्या शुभारंभाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल, मोटार वाहन निरीक्षक भिमराज नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जानजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, वाहनचालक, शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुख्यत: जनजागृती करण्यात येणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना “सडक सुरक्षा जीवन रक्षा” अशी असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडीत आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
सडक सुरक्षा जीवन रक्षा ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. अतिवेगाने तसेच मद्यपान करुन वाहन चालवू नका, वाहने काळजीपूर्वक चालवा, स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी तसेच वाहने चालवताना मोबाईलचा वापर करु नका, समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा अशा प्रकारचा संदेश देण्यात येत आहे. तसेच या रॅलीस मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मार्गस्थ करण्यात आले. रस्ता सुरक्षा जनजागृती ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवात होवून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जालना येथे समारोप करण्यात आला. रॅलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसह मोटार वाहन ड्रायव्हिंग स्कुलने सहभाग नोंदविला.
