खरेदी करताना पावती घेतल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागणे शक्य:डॉ.रमेश तारगे
जय अंबे नर्सिंग कॉलेजमध्ये ग्राहक जनजागृती अभियान संपन्न
जालना/प्रतिनिधी/ धावपळीच्या जीवनात प्रत्येक ग्राहक जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हाच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मुख्य उद्देश असून, त्यासाठीच या जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे,”असे प्रतिपादन जय अंबे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रामेश्वर राजगुडे यांनी केले.जय अंबे नर्सिंग कॉलेज व अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सिंग कॉलेजच्या परिसरात ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ.राजगुडे बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ. रमेश तारगे,प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मंडळ अधिकारी सुरेंद्र पोतदार,उपाध्यक्ष धर्माभाऊ खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पावती हाच ग्राहकाचा सर्वात मोठा पुरावा मार्गदर्शन करताना डॉ.रमेश तारगे म्हणाले की,”ग्राहक म्हणून आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो,तेव्हा तिची रितसर पावती घेणे बंधनकारक आहे.जर आपल्याकडे पावती असेल, तरच आपण फसवणूक झाल्यास ग्राहक आयोगाकडे दाद मागू शकतो.” यावेळी त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची भूमिका आणि ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध तरतुदींबाबत सखोल मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींचा मोठा सहभाग
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी कॉलेजचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.उपस्थित सर्वांना ग्राहक हक्कांची माहिती देणाऱ्या माहिती पत्रकांचे वाटपही करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये ग्राहक हक्कांबद्दल नवी जाणीव निर्माण झाली आहे.