रवना ग्रामपंचायत कार्यालय व विकास कामांचे थाटात उद्घाटन;रवना गाव ठरत आहे जिल्ह्यात आदर्श गाव !
जालना/प्रतिनिधी/ घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायत रवना येथे नवनिर्मित ग्रामपंचायत कार्यालय व विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा माननीय सौ. मनीषाताई राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला. या कार्यक्रमास मा श्री.सतीश भाऊ टोपे साहेब (चेअरमन,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक),सरपंच सौ.शिवकन्या संभाजी देशमुख,नंदूभाऊ देशमुख,दादासाहेब थेटे,ऍडव्होकेट पावशे, मधुकर देशमुख,संभाजी आबा देशमुख तसेच तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी बोलताना मा.सौ.मनीषाताई टोपे यांनी रवना गावाच्या सर्वांगीण विकासाचे विशेष कौतुक केले.“रवना गावाने आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवून इतर गावांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याचा उपक्रम,सुसज्ज ग्रंथालय,संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे,प्रत्येक घरासमोर नारळाचे झाड,पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते,आरोग्य उपकेंद्र,हायमास्ट (हॅमेक्स) लाईट,स्वच्छता व्यवस्था,घंटागाडी,पिण्याच्या पाण्याची सोय व स्मशानभूमी यांसारख्या सुविधा उभारून रवना गाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव बनले आहे.प्रत्येकाने एकदा तरी या गावाला भेट देऊन प्रेरणा घ्यावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.