घनसावंगी तालुक्यातील बोरगाव तांडा क्र. १ येथे पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न
घनसावंगी/प्रतिनिधी/ घनसावंगी तालुक्यातील बोरगाव तांडा क्रमांक १ येथे गेल्या कित्येक महिन्यांपासून नळाला थेंबभरही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा तोंडावर असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी फरफट सुरू आहे.गावातील नळ पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कोलमडली असून, महिलांना व लहान मुलांना पाणी आणण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. काही कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भारही वाढत आहे.
ग्रामस्थांनी याबाबत वारंवार ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पाणीपुरवठा यंत्रणा दुरुस्ती,नवीन बोअरवेल किंवा तात्पुरता टँकर पुरवठा याबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
“पिण्याचे पाणी हा मूलभूत हक्क असून, महिन्यांपासून नळ कोरडे राहणे ही प्रशासनाची गंभीर निष्काळजीपणा आहे,”अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.