कुक्कडगाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरण : दोन महिने उलटूनही चौकशी अहवाल नाही; विस्तार अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अंबड/प्रतिनिधी/ अंबड तालुक्यातील कुक्कडगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबाबत दाखल तक्रारीवर चौकशी होऊन दोन महिने उलटूनही चौकशी अहवाल सादर न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास सचिव, विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोनही मार्ग वापरून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
अनेक तक्रारी दाखल झाल्या नंतर शेवटी जालना जिल्हा परिषद ने तक्रारीची दखल घेत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मिन्नू पी. एम. यांनी अंबड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. पुढे गटविकास अधिकाऱ्यांनी तपासाची जबाबदारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण यांच्याकडे सोपवल्या नंतर पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी जा. क्र. पं. च. अ./पंचा-2/कवि/2025 असा अधिकृत पत्रव्यवहार करून तक्रारदार व संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली.यानुसार 9 ऑक्टोबर 2025 रोजी विस्तार अधिकारी चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून एका जागेवर बसून पंचनामा केला. आवश्यक ग्रामपंचायत च सर्व दप्तर हस्तगत करून सविस्तर तपासणी करून “लवकरच अहवाल सादर केला जाईल” असे चौकशी अधिकार्यांनी तक्रारदारांना सांगितले होते.
मात्र या गोष्टी ला दोन महिने लोटूनही चौकशी अहवाल सादर झालेला नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. या बाबतीत चौकशी अधिकारी चव्हाण यांना वेळोवेळी विचारणा केल्यास चौकशी अधिकारी चव्हाण हे “दोन दिवसात देतो”, “चार दिवसात देतो” अशी केवळ आश्वासने देत चालढकल करीत आलेत असे आरोप तक्रारदार यांच्या कडून करण्यात येत आहे. या चालढकल काळात संबंधित ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दप्तरातील नोंदींमध्ये फेरफार झाल्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली असून, तपासात होत असलेला विलंब ही संशयास्पद बाब असल्याचेही तक्रारदार व ग्रामस्थांचे मत आहे.
*चौकशी अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात*?
चौकशी आदेश असूनही दोन महिन्यांपर्यंत अहवाल न येणे, तक्रारदारांना मिळणारी विलंबित उत्तरे आणि प्रकरणात गती नसल्यामुळे विस्तार अधिकारी चव्हाण यांच्या भूमिकेविषयीही प्रश्न उपस्थित होत आहेत.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार,
“चौकशी अहवालाला विलंब होत आहे का? भ्रष्टाचाराच्या आरोपांना आडोसा मिळत आहे का? संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे का?”
असे प्रश्न तक्रारदार व ग्रामस्थांतून पुढे येत आहेत.कुक्कडगाव ग्रामपंचायतीतील कामांतील कथित अनियमितता, निधी गैरव्यवहार आणि ग्रामसभा न घेणे अशा मुद्द्यांवर दाखल तक्रारींची चौकशी अद्यापही अपूर्ण असल्याने प्रकरण धूसर होत चालले आहे.
तक्रारदारांनी तात्काळ चौकशी अहवाल जाहीर करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी केली असून, विलंबाबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणीही करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.