रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”
गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी
छत्रपती संभाजीनगर :- रब्बी हंगाम 2025-26 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जागरूकता वाढावी आणि सहभाग वाढावा यासाठी 1 ते 7 डिसेंबर दरम्यान 10 वा “पीक विमा सप्ताह” राबविण्यात येत आहे. यानंतरही संपूर्ण डिसेंबर महिनाभर नोंदणी मोहीम सुरू राहणार आहे, शेतकऱ्यांनी या योजनेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2025-26 मधील पीक विमा योजनेत गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या तीन अधिसूचित पिकांसाठी 15 डिसेंबर, 2025 पर्यंत सहभागी होता येणार आहे. पीक विमा योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणे ऐच्छिक आहे. या योजनेत नोंदणीसाठी https://pmfby.gov.in हे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल कार्यान्वित करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत भारतीय कृषी विमा कं. लि. व बीड जिल्ह्यात आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड इं. कं. लि. या कंपनीमार्फत या ही योजना राबविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी गहू (बागायत) 45000 रु. (337.50 रु.), हरभरा- 36000 रु. (270रु.), रब्बी कांदा- 90000 रु. (675रू.), जालना जिल्ह्यासाठी गहू (बागायत) 45000 रु. (450 रु.), हरभरा- 36000 रु. (360रु.), बीड जिल्ह्यासाठी गहू (बागायत) 45000 रु. (675 रु.), हरभरा- 36000 रु. (540रु.), रब्बी कांदा- 75000 रु. (1125रू.) अशी जिल्हा व पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरावयाची आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी, फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा (8-अ उतारा), भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज भरुन सहभागी होता येईल. तर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे. जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे,तांत्रिक उत्पादन आधारे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. रब्बी हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी https://pmlby.gov.in या पोर्टल स्वतः शेतकरी यांनी अथवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, कॉप इन्शुरन्स सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या जिल्ह्यातील संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, स्थानिक कृषि कार्यालयाशी तसेच 14447 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
