वसई, विरार येथील बविआ, उबाठाच्या माजी नगरसेविका, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत
वसई, विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका शकुंतला शेळके आणि युवा अध्यक्ष गणेश धुमाळ, उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आ. स्नेहा पंडीत दुबे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, मंडल अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राजू म्हात्रे, नंदकुमार महाजन, विजेंद्र कुमार, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी आ. स्नेहा दुबे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धती आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन बविआ आणि उबाठा गटातून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वसई, बोईसर व नालासोपारा येथील विविध पक्षातील अनेक जण भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सूक असून अजूनही काही प्रवेश लवकरच होणार आहेत. आज प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीने भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी जिवाचे रान करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मेहनत घेऊन महापालिकेवर भाजपाचा झेंडा नक्की फडकवू अशी ग्वाहीही आ. स्नेहा पंडित दुबे यांनी दिली.
बविआ आणि उबाठा गटातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये वसई येथील साई संस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नागेश शेळके, जयेश धुमाळ, अंकुश शेळके, अनिल सिंग, वासंती धुमाळ, शिल्पा धनगर, समाजसेवक रोहित पाटील, भारतीय लहुजी सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख वेरशी भानुशाली, उबाठा गटाचे भोईदापाडा शाखाप्रमुख शशिकांत अवघडे, आकाश मालेकर आदींचा समावेश आहे.
–मुकुंद कुलकर्णी
