सणांच्या पार्श्वभुमिवर खाद्य पदार्थांची विशेष तपासणी मोहिम
स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव द्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर – दिवाळीपर्यंतचा चार्तुमास व सणांचा काळ असल्याने व तसेच या कालावधीत पावसाळा असल्याने अन्न व औषध प्रशासनाने बाजारात विक्री होणारे खाद्यपदार्थांची विशेष तपासणी मोहिम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. तसेच जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न औषध प्रशासन विभागाची अन्न व नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार करण्याचा प्रस्ताव द्यावा,असेही निर्देश देण्यात आले.
बाजारात विक्री होणारे खाद्य- अन्न पदार्थ, विविध पेये, पाकीटबंद पदार्थ यांच्या तपासणीबाबत विशेष मोहिम राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या बैठकीस सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन द.वि. पाटील, सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्र.प. सुरसे, श्रीमती सु.त्रि. जाधवर, श्रीमती वर्षा रोडे, एस.बी. तायडे, मो. फ. सिद्दीकी, पी.एस. अंजिठेकर उपस्थित होते.
आगामी सण व उत्सवाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिठाई, फरसाण, सुका मेवा अशा अन्नपदार्थांची विक्री होत असते. मागणी जादा असल्याने भेसळीची शक्यता वाढते. अशावेळी घातक घटकांनीयुक्त मिठाईपासून नागरिकांचे रक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. या तपासणीत मिठाईचे उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी, उत्पादनासाठी वापरण्यात येणारे दुध, खवा, मावा, तूप, साखर, मैदा, आणि इतर घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. भेसळयुक्त घटकांचा शोध अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या मार्गदर्शक तत्वानुसार, मिठाईमध्ये वापरण्यात येणारे घटक जसे की खवा मावा, आणि तूप हे भेसळयुक्त आहेत किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे.
नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. मिठाई खरेदी करताना दुकानाची स्वच्छता आणि अन्न परवाना, असामान्य रंग, वास, किंवा चव असलेली मिठाई खरेदी करणे टाळा, परवानाधारक, नोंदणीधारक दुकानातूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
