हिमायतनगर तालुक्यात क्लासेसच्या नावाखाली चालतात अनधिकृत इंग्लिश स्कूल ?
शिक्षण विभाग व गटशिक्षणाधिकारी मूग गिळून गप्प का ?
अनधिकृत इंग्लिश स्कूल बंद करण्याची भगवानदादा भालेराव यांची मागणी
नांदेड/ हिमायतनगर तालुक्यात शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजलेले पहावयास मिळत असून अगोदरच १४ जिल्हा परिषद शाळा बिनशिक्षकी शाळा असून तालुक्यामध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षक रिक्त आहेत. सध्याचे गटशिक्षणाधिकारी मोठ्या सीताफिने हिमायतनगर तालुक्याच्या शिक्षण विभागाचा गाडा सांभाळताना दिसून येत आहेत. अशातच हिमायतनगर तालुक्यामध्ये अनधिकृत शाळा , क्लासेस, इंग्लिश स्कूल यांनी डोके वर काढले असून यांचा उपद्रव शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी यांच्या नजरेतच पडत नाही. अनधिकृत शाळा, क्लासेस तसेच इंग्लिश स्कुलच्या संचालकांनी विद्यार्थ्यांची टी.सी. जिल्हा परिषद शाळेत ठेवत क्लासेस साठी विद्यार्थी त्यांच्या शाळेत, क्लासेस, इंग्लिश स्कुलमध्ये दिवसाढवळ्या दिसून येत आहेत. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांनीही त्या विद्यार्थ्यांची हजरी कशी टाकतात अन् हा प्रकार कसा खपवून घेतला जात आहे याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय सम्राट सेनाचे संस्थापक अध्यक्ष भगवानदादा भालेराव यांनी आपल्या तक्रारीतून हिमायतनगर तालुक्यातील क्लासेसच्या नावाखाली चालणाऱ्या अनधिकृत इंग्लिश स्कुल बंद करण्याची तक्रार गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, हिमायतनगर शहरातील कुसुम हायटेक इंग्लिश स्कुलला युडाईस (UDISE ) क्रमांक नसताना, शासनाची कोणतीही परवानगी नसतानाही पहिली ते दहावीपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत अनधिकृत शाळा सुरू आहे. सदरील शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवेश तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत व इतर शाळेत असून उपस्थिती शाळेमध्ये व विद्यार्थी कुसुम हायटेक इंग्लिश स्कुलमध्ये आहेत. तसेच ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच्या नावाखाली माने सर हे २ ते ५ पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत UDISE युडाईस नसताना अनधिकृतपणे क्लासेसच्या नावाखाली शाळा चालवीत आहेत. तसेच हिमायतनगर तालुक्यात अनेक ठिकाणी प्रायमरी इंग्लिश स्कुलच्या नावाखाली पहिली ते पाचवी पर्यंत परवानगी नसताना शासनाची दिशाभूल करून लाखो रुपये कमवत आहेत.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाही करावी. तसेच अनधिकृत इंग्रजी शाळा बंद करण्यात यावी अन्यथा १५ जुलै मंगळवार रोजी अमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही अखिल भारतीय सम्राट सेनेचे संस्थापक अध्यक्ष भगवानदादा भालेराव यांनी निवेदनातून दिला आहे.