प्लास्टिकवर बंदी, मात्र ती कागदावरच
आष्टी शहरातील स्थिती : कडक अंमलबजावणीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / परतूर : प्लास्टिकचे विघटन लवकर होत नसल्याने पर्यावरणासाठी ते कायमच धोकादायक ठरले आहे. प्लास्टिक पासून थोडी तरी सुटका व्हावी, यासाठी केंद्र शासनाकडून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र ग्राम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परतूर तालुक्यातील आष्टी शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदी कागदावर असल्याचे दिसून येत आहे.
प्लास्टिक हे पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक असल्याने केंद्र शासनाच्या एका अध्यादेशानुसार एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्याचे आदेश असून पर्यावरण विभागानेही राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना यांची सुचना दिलेल्या आहेत. ज्या प्लास्टिक वस्तुंचा एकदाचं वापर होतो व ते निरुपयोगी होते अशांना सिंगल युज प्लास्टिक असे संबोधले जाते.एकाच वापरानंतर प्लास्टिक निरुपयोगी ठरत असले तरी त्याचे सहजासहजी विघटन होत नाही.ते जाळल्यास विषारी वायू निर्माण होऊन त्यापासून नागरिकांना कर्करोग होण्याची शक्यता असते. शहरातील प्लास्टिक बंदी करण्यासाठी ग्राम प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. परंतु ग्राम प्रशासना याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठ दहा वर्षांपासून एकदा ही ग्राम प्रशासनाकडून कारवाई झालेली नसल्याने आज रोजी सर्वत्र किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी बंदी असलेल्या कॅरी बॅगचा वापर केला जात आहे.
शहरातील अनेक ठिकाणच्या कचऱ्यांच्या ढिगामध्ये प्लास्टिक दिसून येते, याशिवाय नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून येत आहे. प्लास्टिकमुळे नाल्या, तुंबत असल्याचे दिसून येत आहे.तसेच नियमितपणे नाल्यांची स्वच्छता होत नसल्याने ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ग्राम प्रशासनाने लक्ष घालून गावांतील प्लास्टिक बंद करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयांत देण्यात आले आहे.