Monday, March 30, 2026
HomeUncategorized'आप'कडून उच्चशिक्षित उज्वला मुंडे यांची उमेदवारी निश्चित; प्रस्थापितांच्या 'पाणी' प्रश्नावर ओढले ताशेरे

‘आप’कडून उच्चशिक्षित उज्वला मुंडे यांची उमेदवारी निश्चित; प्रस्थापितांच्या ‘पाणी’ प्रश्नावर ओढले ताशेरे

प्रभाग १० मध्ये परिवर्तनाचे रणशिंग! ‘आप’कडून उच्चशिक्षित उज्वला मुंडे यांची उमेदवारी निश्चित; प्रस्थापितांच्या ‘पाणी’ प्रश्नावर ओढले ताशेरे

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शहराच्या राजकारणात आता ‘आम आदमी पार्टी’ने (आप) जोरदार मुसंडी मारली आहे. प्रभाग क्र. १० (ब) मधून उच्चशिक्षित आणि अनुभवी व्यक्तिमत्व उज्वला मुंडे यांची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रभागातील प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दणाणले असून, एका सुशिक्षित महिला उमेदवाराच्या एन्ट्रीने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

पक्ष नेतृत्वाचे मानले आभार

उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होताच उज्वला मुंडे यांनी ‘आप’च्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके, महाराष्ट्र प्रभारी माजी आमदार प्रकाश जारवाल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती मेनन शर्मा, राज्य निवडणूक प्रभारी रंगादादा राचूरे आणि राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे यांनी दाखवलेल्या विश्वासावर आपण नक्कीच खरे उतरू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रस्थापितांच्या अपयशावर प्रहार: “नाथसागर उशाला, तरीही शहर तहानलेले!”

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उज्वला मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या की, “छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत वर्षानुवर्षे तेच तेच चेहरे सत्तेत आहेत. मात्र, सामान्यांच्या मूलभूत गरजा सोडवण्यात हे सर्वच अपयशी ठरले आहेत. शहराच्या उशाला ‘नाथसागर’ (जायकवाडी धरण) असूनही शहरवासीयांना महिन्याला केवळ तीनच वेळा पाणी मिळते, ही अत्यंत दुर्दैवी आणि शरमेची बाब आहे. प्रस्थापितांनी केवळ आश्वासने दिली, पण कामे केली नाहीत. आता जनता या अन्यायाचा हिशोब चुकता करेल.”

शिक्षणाचा आणि पत्रकारितेचा दांडगा अनुभव

उज्वला मुंडे या केवळ राजकारणी नसून त्या एक उच्चशिक्षित (एम.ए.) महिला आहेत. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांपासून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील तळागाळातील प्रश्न, शेवटच्या कुटुंबाच्या व्यथा आणि प्रशासकीय त्रुटी जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे प्रभागाच्या समस्यांची त्यांना सखोल जाण आहे. ‘आप’चे प्रदेश सचिव सुग्रीव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद केजरीवाल यांच्या जनसेवेचा वसा घेऊन त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

विकासाचा ‘दिल्ली पॅटर्न’ आता प्रभाग १० मध्ये

उज्वला मुंडे यांनी आपल्या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे मांडताना ‘विकास’ हाच केंद्रबिंदू ठेवला आहे:

  • पाणी नियोजन: “पाण्याचा प्रश्न प्राथमिक समजून तो प्राधान्याने सोडवणार. प्रत्येक घराला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळेल, असे नियोजन केले जाईल.”
  • शिक्षण आणि आरोग्य: “प्रभागात उच्च दर्जाच्या स्मार्ट शाळा आणि उत्कृष्ट अंगणवाडी शाळांची निर्मिती केली जाईल. दिल्लीच्या धर्तीवर महिलांच्या आरोग्यासाठी प्रत्येक भागात ‘मोहल्ला क्लिनिक’ सुरू करणार.”
  • पायाभूत सुविधा: “खड्डेमुक्त रस्ते आणि सुसज्ज ड्रेनेज लाईनचे जाळे निर्माण करून प्रभागाचा चेहरामोहरा बदलणार.”
  • सुरक्षा आणि पर्यावरण: “माता-भगिनींसाठी सुरक्षित प्रभाग आणि प्रदूषणमुक्त परिसर ही आमची प्राथमिकता असेल.”

प्रभाग १० मध्ये परिवर्तनाची लाट

उज्वला मुंडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग १० मधील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. एका बाजूला प्रस्थापित पक्षांची जुनी फळी आणि दुसऱ्या बाजूला ‘आप’ची उच्चशिक्षित, आक्रमक आणि अभ्यासू उमेदवार अशी ही लढत होणार आहे. “सामान्य जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल ‘झाडू’च्या माध्यमातूनच येईल,” असा ठाम विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

आगामी काळात प्रभाग १० मध्ये उज्वला मुंडे यांचा जनसंपर्क आणि त्यांचा ‘व्हिजनरी’ अजेंडा प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे करणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments