‘वीरगाथा पर्व ५.०’ स्पर्धेत भोकरदनच्या ‘पायोनियर स्कूल’चा ओम गिरी जिल्ह्यात प्रथम
भोकरदन/प्रतिनिधी/ भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित पायोनियर इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल (जोमाळा) चा विद्यार्थी ओम मनोज गिरी याने ‘वीरगाथा पर्व ५.०’ या केंद्र सरकारच्या उपक्रमात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत आयोजित या स्पर्धेत ओमने इयत्ता ९ वी ते १० वी या गटातून सहभाग नोंदवला होता. त्याच्या या यशाबद्दल जालना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET) प्राचार्या एस.आर. देशमुख आणि समन्वयक भारत सुर्यवंशी यांच्या हस्ते ओम गिरी आणि त्याच्या पालकांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला.
यशाचे सर्वत्र कौतुक
ओमच्या या देदीप्यमान यशाबद्दल जनविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख व सर्व संचालक मंडळ, तसेच शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ओमच्या या यशामुळे संपूर्ण भोकरदन तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
