वली मामू परिसरातील कुंडलिका नदीतील खड्ड्यात पडून आजी-नातवाचा मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याची पोलिसांत तक्रार..
जालना/प्रतिनीधी/ दिनांक 26 शुक्रवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कुंडलिका नदी परिसरात सुरू असलेल्या अपूर्ण ड्रेनेज कामामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. नदीत खोदलेला खड्डा तसेच ठेवण्यात आल्याने त्यात पडून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दिनांक 25 गुरुवार रोजी जनाबाई आनंदराव खरात व त्यांचा नातू राज कृष्णा खरात हे सरपण आणण्यासाठी कुंडलिका नदीकाठी गेले होते. मात्र नदीत खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दोघांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत मुलाचा वडील कृष्णा आनंदराव खरात यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा खरात यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 223, 272, कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ड्रेनेजचे काम अपूर्ण ठेवून खड्डा तसाच सोडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाईची तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधीत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सानप हे करत आहेत.