उपविभागीय अधिकारी याचे आदेश असूनही रस्ता खुला नाही;अंमलबजावणीबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह
जालना/प्रतिनिधी/ कोठी येथील शेतकरी विष्णू कदम यांच्या शेताकडे जाणाऱ्या वहिवाटीच्या रस्त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तहसीलदार यांनी दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते.या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाचे पथक दोन वेळा घटनास्थळी दाखल झाले;मात्र कार्यवाही पूर्णत्वास गेली नाही.त्यानंतर प्रकरण अपीलमध्ये गेले असता १३ मार्च २०२६ रोजी SDM कार्यालय अंबड यांनी संबंधित बाबीवर आदेश दिल्यानंतर पुन्हा एकदा पथक कोठी येथे आले.तरीदेखील प्रत्यक्ष रस्ता खुला करण्याची प्रक्रिया अपूर्णच राहिल्याचे दिसून येते.दरम्यान,रस्ता उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास गंभीर अडथळे निर्माण झाले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.यामुळे आर्थिक फटका बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे,एकाच प्रकरणात वारंवार पथक पाठवूनही प्रत्यक्ष निकाल लागत नसल्याने प्रशासनाने ठोस आणि परिणामकारक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
आदेशांची केवळ नोंद न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार?
शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार?
अशा प्रश्नांमुळे सदर प्रकरण आता गंभीर बनले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून रस्ता खुला करण्याबाबत स्पष्ट व अंतिम कार्यवाही करावी,अशी मागणी पुढे येत आहे.