Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादउन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी  घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी  घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी

काळजी  घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 जालना :-  उष्माघात ही उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या आहे. ही समस्या तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यामुळे होऊ शकते उन्हाळी हंगामातील उष्मालाटेमुळे उदभवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशु- प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन प्र.निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे.

उष्मालाटेपासून बचावासाठी पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.  घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.  दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.  सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.  हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.  उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.  शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.  अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.  घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.  पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.  सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.  पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.  गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.  दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.  उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.  लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.  गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.  उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.  अशा सुचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments