प्रति, माननीय संपादकजी,
विषय:-सिंहस्थ कुंभमेळासाठी साधुग्राम अवश्य उभारा; परंतु एकाही झाडाची हत्या होणार नाही याचीही खबरदारी सरकारने घ्यावी.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा ३१ आक्टोंबर २०२६ ला सुरू होणार असून २४ जुलै २०२८ पर्यंत चालेल ही आनंदाची गोष्ट आहे.याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे आणि व्हायलाच पाहिजे.परंतु कोणताही कार्यक्रम आखतांना पर्यावरणाला विशेष महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे.कारण आपल्या सुख-सुविधांसाठी पर्यावरणाचा ह्रास देवीदेवता किंवा पर्यावरणवादी सहन करणार नाही.सरकारने विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे.पर्यावरण वाचले तरच पुढची पिढी, निसर्ग,पशुपक्षी,औषधीयुक्त वनस्पती,जीवजंतू सुरक्षित राहील याची जाण सरकारने ठेवली पाहिजे.साधुग्रामसाठी सरकार वृक्ष तोडीबद्दल राजकारण होत असल्याचे माननीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस म्हणतात, परंतु यात तथ्य नाही.कारण जशे-जशे वृक्ष कटाई होत राहिल तशे-तशे सर्वांचेच आयुष्य कमी-कमी होत जाईल ही बाब मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. वृक्षतोड म्हणजेच मानव, पशुपक्षी व संपूर्ण जीवजंतू यांचे आयुष्य दिवसेंदिवस कमीकमी होणे होय.त्यामुळे वृक्षतोडीला राजकीय उपमा देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.वृक्ष हे पृथ्वीचा,निसर्गाचा, पर्यटनाचा,मानव-पशुपक्षी-संपुर्ण जीवजंतू यांचा आत्मा आहे. आम्हीही सनातनवादी व हिंदू आहोत.परंतु जो निसर्ग प्राणवायू देतो आणि लाखोंचे प्राण वाचवितो अशा झाडांची कत्तल वर्षभराच्या कार्यक्रमासाठी तब्बल १८०० पेक्षा अधिक मोठमोठ्या झाडांची कटाई करने म्हणजे ही हत्या नाही तर काय? मुख्यमंत्री म्हणतात की प्रमागराज येथे कुंभमेळ्यासाठी तब्बल १५ हजार हेक्टर जमीन उपलब्ध होती याचे स्वागतच ती जमीन बंजार असावी किंवा तिथे झाडे नसावेत.कारण उत्तरप्रदेश १५ हजार हेक्टर मधील झाडांच्या कटायीची कोणतीही घटना सामोरं आलेली नाही आणि आपण प्रयागराजची तुलना नाशिकशी का करावी?मुख्यमंत्री म्हणतात की प्रमागराज कुंभमेळाव्याच्या तुलनेत नाशिक येथे साधुग्रामसाठी केवळ ३५० एकर जमीन आहे.माननीय मुख्यमंत्री महोदय ३५० एकर म्हणजे कमी जागा झाली काय?ही आपली व सरकारची जबाबदारी आहे की ३५० एकरमधील एकही वृक्ष कटायला नकोच. कारण नाशिक ही राज्यासह देशासाठी पावण भुमि आहे सोबतच देशाचे मोठे पर्यटन स्थळ सुध्दा आहे.देश-विदेशातील नागरिक व पर्यटक देवदर्शनासाठी अवश्य येतातच यात दुमत नाही.मुख्यत्वेकरून तपोवनाचा आनंद घेऊन स्वतःला धन्य मानतात.कारण तपोवनात भगवान राम,लक्ष्मण व सीता याची पावन भुमि असल्याने साक्षात भगवान राम यांचे साक्षात दर्शन झाल्याचा भास सर्वांनाच होतो.त्यामुळे सरकारने कोणतेही चुकीचे पाऊल न उचलता साधुग्रामसाठी योग्य ती जागा उपलब्ध करावी.कारण झाडे वाचली तरच पुढची पिढी सुरक्षित राहील अन्यथा झाडांसोबतच मानव, पशुपक्षी व संपूर्ण जीवजंतूंचा ह्यास झाल्याशिवाय रहाणार नाही हेही तितकेच सत्य आहे.त्यामुळे तपोवनातील एकही झाड न तोडता साधुग्राम उभारत असेल तर त्याचे स्वागत सर्वच स्तरातून होईल.मी सरकारला एक सुचणा देतो की वृक्ष तोडीच्या विरोधात सामाजिक संघटना, नाशिककर, राजकीय पक्ष, अभिनेता सामोरं येतं असेल तर याचे स्वागत सरकारने सुध्दा करावे कारण आपण पहिलेच प्रदुषणाने गुदमरत आहोत याची जाण सरकारने ठेवाली पाहिजे.झाड तोडणीसाठी मुजोरी करून चालणार नाही.आवश्यकता असेल तर झाडांच्या फांद्यांची छाटणी अवश्य करावी.सरकाने तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न सौहार्दपूर्ण पध्दतीने हाताळला पाहिजे आणि पर्यावरण, निसर्ग, पर्यटन,पर्यटक यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही याचीही खात्री केली पाहिजे.मंत्री नितेश राणे पर्यावरणाची तुलना ईदच्या बकरी कापण्याशी करून वादग्रस्त वक्तव्य करतात ही हास्यास्पद बाब आहे .राणे साहेब ईद हा वेगळा मुद्दा झाला यांच्याशी आणि पर्यावरणाशी काहीही संबंध नाही.अहो राणे साहेब १८०० झाडांची कत्तल म्हणजे १८ लाख लोकांचा,पशुपक्षांचा व जीवजंतूची श्वास कोंडून हत्याच ना! याचा आपण विचार का करीत नाही.आम्हाला राजकारण नकोच फक्त पर्यावरण सुरक्षित रहावे,पृथ्वीचे संतुलन सुरक्षित असावे, सर्वांना शुद्ध हवा मिळावी, पर्यटकांना तपोवनाचा आनंद मिळावा हाच आमचा पर्यावरणवाद्यांचा व जनतेचा खरा उद्देश आहे.नाशिक मनपा प्रशासनाच्या व सरकारच्या निर्णयाचा साधू-महंतांनी कडाडून विरोध करायला हवा.कारण साधू-महंतांचे वास्तव मुख्यत्वे करून हे वृक्षांच्या सानिध्यात असते आणि असायलाच पाहिजे.नाशिकच्या तपोवनाचा इतिहास रामायणाशी सुध्दा जुळला आहे.याच तपोवनात भगवान राम,सीता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या १४ वर्षाच्या वनवासातील बराचसा काळ याठिकाणी घालवीला होता. त्यामुळे हे पावण स्थळ राज्यासाठीच नाही तर देशासाठी व जगासाठी ऐतिहासिक स्थळ मानल्या जाते.त्याचप्रमाणे याच स्थळी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते असेही सांगितले जाते.आपण रामराज्य प्रस्थापित करण्यासाठी अयोध्येत भव्य राममंदिर उभारले ही देशासाठी ऐतिहासिक आणि गौरवशाली बाब आहे.परंतु ज्या तपोवनात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांचा सहवास होता आणि लक्ष्मणाने ज्या ठिकाणी शूर्पणखेचे नाक कापले अशा ऐतिहासिक आणि पौराणिक वास्तव्याला जर सरकार १८०० वृक्ष कापून काडीमोड करून नेस्तनाबूत करीत असेल तर ही कसली रामराज्याची कल्पना म्हणावी! तपोवनातील एक जरी वृक्ष कटत असेल तर हा मानवजातीवर,पशूपक्षांवर,निसर्गावर,पौराणिक कथांवर व देशातील जनतेच्या भावनांवर मोठा प्रहार समजल्या जाईल. आपण जेव्हा रामराज्याची कल्पना करतो तेव्हा सर्वच बाजूंचा विचार सरकारने केला पाहिजे.प्रश्न रहाला साधू महंतांच्या वास्तव्याचा यासाठी अनेक पर्यायी व्यवस्था सरकार जवळ आहेत.पटांगत, ग्राउंड,शासकीय कॉटेजेस,धर्मशाळा, राजकीय पुढाऱ्यांचे फॉर्म हाऊस व त्यांची शेत जमीन असे अनेक पर्याय आहेत.परंतु साधू महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवनातील १८०० पेक्षा जास्त वृक्षांची हत्या करून साधूग्राम तयार करने म्हणजे निसर्गाची खुली हत्याच!आज आपण पहात आहोत की, देशासह जगात बदलत्या हवामानामुळे महाप्रलय, सुनामी, भुकंप,अती पाऊस,अती उष्णता यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हा संपूर्ण प्रकार जंगल कटाई व वृक्षतोडीमुळे होत आहे ही बाब सर्वांच्या डोळ्यासमोर आहे तरीही नाशिकमधील ऐतिहासिक तपोवनातील वृक्षांची कत्तल करण्यासाठी सरकार हिरवी झेंडी देत ही अत्यंत दुर्भाग्य पुर्ण बाब आहे.ही अशी गोष्ट झाली की “आ बैल मुझे मार”. सरकार सांगते की झाडे लावा,झाडे जगवा आणि स्वतः तब्बल १८०० झाडांची कत्तल करायची हा कुठला न्याय म्हणावा!आज एक वृक्ष लावले तर त्याला मोठे व्हायला ५ ते १० वर्षे लागतात आणि नाशिक मनपा प्रशासन व सरकार एकाच वेळेस १८०० वृक्ष कापण्याचा आदेश देत आहे ही फक्त नाशिकलाच नाही तर देशाला घातक सिद्ध होवू शकते.आज देशातील व राज्यातील वृक्षतोडीमुळे प्रदुषणाच्या बाबतीत भारत अत्यंत गंभीर व धोकादायक स्थितीत आहे.जगातील टॉप १०० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ६५ शहरे एकट्या भारतातील आहेत.यात मुख्यत्वे करून दरभंगा, आसोपूर, पाटणा,नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई,हैद्राबाद,बंगळूरु, चेन्नई यांचा समावेश आहे आणि आता नागपूर सुध्दा प्रदुषणाच्या छायेत आहे.त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत भारताची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.वाढत्या प्रदुषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, जंगलकटाई, सांडपाणी, मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन, हवाई वाहतूक इत्यादींमुळे आज पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झालाआहे.तपोवनातील एकही वृक्ष कटणार नाही याची जबाबदारी सर्वप्रथम मनपा प्रशासनने व सरकारने घेतली पाहिजे.नाशिककर, निसर्गप्रेमी,समाजसेवी संघटना, अनेक राजकीय पक्ष तपोवनातील वृक्ष तोडीच्या विरोधात उभे ठाकले आहे आणि आता या आंदोलनाला मोठे बळ वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यामुळे मिळाले आहे ही स्वागतार्ह बाब आहे. सरकारने वृक्ष लावणे शिकावे व वृक्ष तोडणे टाळावे.आज राज्यातील प्रत्येक शहरापासून ३० किलोमीटर अंतरापर्यंत शहरीकरण झालेले आहे.यामुळे लाखोंच्या संख्येने झाडांची खुलेआम कत्तल सरकारने केली आणि याचे प्रायश्चित्त राज्याच्या जनतेला प्रदुषणाच्या माध्यमातून भोगावे लागत आहेत.त्याचप्रमाणे अनेक हिंसक पशु शहराकडे धाव घेत आहेत हा सर्व प्रकार वृक्षतोडीमुळे निर्माण झाला आहे. झाडांच्या कत्तलमूळे दिवसेंदिवस ऑक्सिजनची मात्रा कमी-कमी होत आहे याचे भान सरकारने ठेवले पाहिजे. नाशिक मनपा प्रशासन व सरकार आपण जर चुकीचे पाऊल उचलले तर याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील. सरकारने नाशिककरांच्या भावनांचा,पौराणिक कथांचे वास्तव,निसर्गाची ढासळती परिस्थिती,बदलते हवामान, पर्यटक,पर्यटन या संपूर्ण बाबींचा गांभीर्याने विचार करावा आणि तपोवनातील झाडांच्या कत्तलीचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा याचे गंभीर परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील.झाडे वाचली तरच पुढची संपूर्ण पिढी सुरक्षित राहील.जय हिंद.
–रमेश कृष्णराव लांजेवार
