रखरखत्या उन्हाळ्यात हिरवाईने नटलेले शुभ वर्तमान

0
53

रखरखत्या उन्हाळ्यात हिरवाईने नटलेले शुभ वर्तमान

 

अरण्यम प्रकल्प;कातपूर येथे ४.२५ हेक्टरवर

१ लाख २७ हजार रोपांची घनवन लागवड

 

छत्रपती संभाजीनगर – पैठण तालुक्यात मौजे कातपूर येथे सामाजिक वनीकरण विभागामार्फत अरण्यम घनवन प्रकल्प साकारला आहे.  या प्रकल्पात ४.२५ हेक्टर क्षेत्रावर १ लाख २७ हजार ५०० रोपांची लागवड यशस्वी करुन हे घनवन आकाराला आले आहे. सन २०२१ पासून हा प्रकल्प साकारला जात होता. आज तेथे निर्माण झालेली घनदाट हिरवाई वृक्षराजीच नव्हे तर पशुपक्षांसह जैवविविधता संवर्धनास पोषक ठरली आहे. एरवी रखरखत्या उन्हाळ्यात सावलीच्या शोध घेणाऱ्या मनासाठी हे हिरवाईने नटलेले गारवा देणारे शुभवर्तमानच होय.

कातपूर येथील अरण्यम प्रकल्पाविषयीचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या समक्ष करण्यात आले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उमाकांत पारधी, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन  अधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, वुई फॉर एन्व्हायरमेंट सामाजिक संस्थेच्या मेघना बडजाते यांची उपस्थिती होती.

नाविन्यपूर्ण प्रकल्पअंतर्गत तीन वर्षात जिल्हा प्रशासनाने जायकवाडी पाटबंधारे कॉलनीच्या उत्तर बाजूस नारळीबाग मौजे कातपूर येथे अरण्यम हे घनवन साकारले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. २१ कोटी ९६ लाख ६२ हजार २५३ रुपये इतका खर्च या प्रकल्पासाठी लागला असून प्रति रोप १७२ रुपये इतका खर्च लागला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरामध्ये वृक्ष लागवड करून पशुपक्षांसाठी अधिवास निर्माण करणे हा होता. जैवविविधतेचे संवर्धन व पुनरुज्जीवन याद्वारे करण्यात आले. घनवन पद्धतीने स्थानिक वृक्ष प्रजातीचे संवर्धन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्बन सिंक यामध्ये तयार केले जात आहे.  दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या वृक्षप्रजातींची  जीन बँक या ठिकाणी तयार होत असून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना येथे वाव असणार आहे. पाणी, हवा, पक्षी इत्यादीच्या माध्यमातून बीज प्रसार करून जमिनीवर जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी या अरण्य प्रकल्पाचा फायदा होईल,असे सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी  कीर्ती जमदाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

घनवन लागवड पद्धती

जपानी शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी घनवन लागवड पद्धती विकसित केली. या पद्धतीच्या मशागत पद्धतीमध्ये काही बदल करून अरण्यम पद्धतीमध्ये रूपांतरित करून या प्रकल्पात साधारण ३०९ पेक्षा जास्त विविध जातीच्या वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे.

अरण्यम् घनवनाचे फायदे

अरण्य प्रकल्प हा इतर ठिकाणी राबविण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प असून जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प तसेच पक्षी अभयारण्य येथे आहे. त्याचा परस्पर फायदा दोन्ही प्रकल्पांना होऊ शकतो. संशोधन तसेच पर्यटनासाठी या घन वनाचा फायदा होईल. पर्यटन स्थळ आणि दुर्मिळ वृक्ष प्रजातीचे परिचय केंद्र तथा संग्रहालय म्हणून  हा प्रकल्प विकसित होऊ शकतो.  यामुळे परिसरातील जैवविविधता विकसीत होऊन परिसरातील पर्यावरण संवर्धनाला गती येईल.

दुर्मिळ वृक्ष प्रजातींची लागवड

एकूण ४.२५ हेक्टरवर १ लाख २७ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात कोकम, नील, नारळ, पाम, गोवर्धन, चंपा, सारंगी, जायफळ, भोकर, कुंदा, दालचिनी, तेजपत्ता, अगर, उड, अंजन, लीची यासारख्या उपयुक्त वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औषधी महत्त्व असलेल्या अर्जुन, साल, ब्रह्मवेली, दुर्गाडा, जाय, लिली, निरगुडी, निळी, वेलची, वाळा, राकस, मेहंदी, शेवरी ,ओवा ,सदाफुली, काळीमिरी, तुळस, शतावरी,पुदिना,धोत्रा, कुसुम, रिठा ,चाफा ,बोरसाल ,केळी, नारळ, सौंदड ,रुद्राक्ष ,तगर ,बोर, सुपारी ,रक्तचंदन ,लाल चाफा, देव चाफा ,पांगरा, पळसपांग्रा, धामण, हेरडा, पळस ,भोकर, काशीद ,गुलाब ,साग ,जुई, बदाम, सीता ,अशोका, तुळस, कापूर, तुळस ,कृष्णकमळ, आपटा, रुई, केवडा, चारोळी, चेरी ,मोह ,अशोक, खैर , कदंब तुती, मोगरा, जास्वंद, चांदीपाठ, रातराणी, उंबर ,आवळा, खारीक, बेहडा, जांभूळ ,मोहगणी, खारीक, चिंच, रामफळ, कनेर,  ड्रॅगन फ्रुट यासारख्या वृक्षांची लागवड प्रकल्पात करण्यात आली आहे.