आरएसएसला धडक देण्याची ताकद फक्त भीमसैनिकातच
छत्रपती संभाजीनगरातील वंचित बहुजन आघाडीचा काल झालेला मोर्चा हा केवळ आंदोलन नव्हत,तो इतिहासाचा नवा अध्याय होता! आरएसएसच्या उरावर संविधानाचा तिरंगा घेऊन उभं राहण्याचं धाडस आजपर्यंत कोणी केलं नसेल,पण वंचित बहुजन आघाडीनं करून दाखवलं.देशभरात “संविधान विरुद्ध मनुवाद” या संघर्षाची ठिणगी पुन्हा प्रज्वलित करणारा हा मोर्चा आरएसएसला थेट टप देणारा तडाखा ठरला आहे.
“धमक” दाखवणारी एकमेव शक्ती आंबेडकरवादी!
आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आरएसएसवर टीका केली,पण त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं धाडस कुणी दाखवलं नाही.जे दाखवून दिलं ते आंबेडकरवादी विचाराचे योद्धे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आणि तरुण भीमसैनिकांनी पोलिसांचा मनाई आदेश धुडकावून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला आणि दाखवून दिलं की संविधानावर श्रद्धा ठेवणारा समाज हा कुणाच्याही भीतीने मागे हटत नाही. आरएसएससारख्या संघटनेच्या विचारमूल्यांना थेट आव्हान देणं हे छोटं काम नाही.ज्यांच्या हातात सत्तेचा आणि प्रशासनाचा लगाम आहे, त्यांच्याच विचारसरणीला सामोरं जाणं म्हणजे लोकशाहीतील खरी परीक्षा. आणि ती परीक्षा सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने यशस्वीपणे पार केली आहे!
संविधान जिंदाबाद!” विरुद्ध “मनुवाद मुर्दाबाद!
या मोर्चानं एक स्पष्ट संदेश दिला देशात आता भीती नव्हे,तर बुद्ध आणि आंबेडकराचा विचार बोलतोय.मनुवादाच्या दडपशाहीला थारा नाही,संविधानाचं वर्चस्वच अंतिम आहे.आरएसएससारख्या नोंदणीहीन संघटनेच्या कार्यालयावर संविधान आणि तिरंगा ठेवून वंचित बहुजन आघाडीनं दाखवलं की राज्यघटनेचा दर्जा शब्दात नाही,तो कृतीत आहे.शेकडो पोलिस,बॅरिकेटींग,मनाई आदेश काहीच फरक पडला नाही.कारण विचार जेव्हा जळतो,तेव्हा लोखंडही वितळतं.हा मोर्चा ज्वलंत विचारांचा आणि तत्त्वनिष्ठ लढ्याचा प्रतीक बनला.
“आरएसएसला कोणी थांबवू शकेल का? देशभरात गाजणारा प्रश्न.
आज संपूर्ण देश विचारतोय आरएसएसला कुणी टप देऊ शकेल का? उत्तर एकच आहे “होय! आणि ते फक्त आंबेडकरवादीच!” ही केवळ घोषणा नाही,तर या मोर्चाने प्रत्यक्ष सिद्ध केलेली सत्यता आहे.आंबेडकरवादी विचारवंतांनी,कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी दाखवून दिलं की,ज्यांनी संविधान लिहिलं,त्यांचेच अनुयायी संविधानाचं रक्षण करण्यास सर्वात पात्र आहेत.या मोर्चानं मनुवादाला थेट आरशात उभं केलं आणि देशभरात चर्चा सुरू झाली.
आंबेडकरवाद ही केवळ विचारसरणी नाही, ती प्रतिकाराची जिवंत चळवळ आहे!
सुजात आंबेडकर आक्रमक, तेवढच शिस्तबद्ध नेतृत्व.या आंदोलनात सुजात आंबेडकरांनी घेतलेली भूमिका अत्यंत परिपक्व, विचारपूर्वक आणि धाडसी होती.त्यांचा प्रश्न सरळ होता. “आरएसएसकडे शस्त्रं आली कुठून? त्यांना परवानगी कोणी दिली?”
हा प्रश्न केवळ संघावर नाही,तर राज्यकर्त्यांच्या दुहेरी निकषांवरही थेट वार आहे.
सुजात आंबेडकरांचं नेतृत्व हे नव्या पिढीला दिलेलं प्रेरणास्थान आहे.त्यांच्यात बाळासाहेब आंबेडकरांचा विचार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसतो.त्यांच्या उपस्थितीनं आंदोलनाला क्रांतीचा जोश आणि संघटनात्मक शिस्त दिली.
“आरे उठा उठा रे बहुजनांनो…
भिमशाहीर मेघानंद जाधव यांच्या गीतांनी मोर्चाचा आत्मा प्रज्वलित केला.
“आरे उठा उठा रे बहुजनांनो, मशाल पेटू एकीची,
आरएसएस विचारसरणी मूळासकट रे छाटायची!”
ही केवळ कविता नव्हती ती रणशिंगाची हाक होती!
ती ओळ सांगते की हा लढा संपलेला नाही तो सुरू झालाय,आणि आता प्रत्येक बहुजनाच्या हातात संविधानाची मशाल आणि सत्याची तलवार आहे.
“आता मौन नाही, संघर्ष आहे!
वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा देशातील प्रत्येक दलित,वंचित,शोषित,आणि प्रगतिशील नागरिकासाठी प्रेरणादायी आहे.तो सांगतो “भीमाचा अनुयायी झुकत नाही, तो फक्त उभा राहतो आणि इतिहास घडवतो.” आरएसएसवर टीका करणे सोपे आहे, पण त्यांच्या दाराशी संविधान, तिरंगा पोहोचवणे हे कृतिशील आंबेडकरवादाचं सर्वोच्च उदाहरण आहे.आज छत्रपती संभाजीनगरानं सिद्ध केलं मनुवाद कितीही संघटित आणि सत्तेत असला तरी,संविधान आणि आंबेडकरवादासमोर तो शेवटी नतमस्तक होणारच! हा मोर्चा नाही,ही क्रांती आहे.ही भीमभूमी आहे,आणि इथं मनुवाद खपवून घेतला जाणार नाही.
