अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही अनुदान नाही!
कुक्कडगांव शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तीव्र नाराजी; दिवाळी गेली पण भरपाई नाही
अंबड/प्रतिनिधी/ माहे सप्टेंबर महिन्यात जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य सरकारने त्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा देत दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत एक रुपयादेखील जमा झालेले नाही.
अंबड तालुक्यातील सुखापूरी मंडळातील कुक्कडगांव सह अनेक गावातील शेतकरी आजही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मोबाईलवर कोणताही एसएमएस आला की शेतकरी मोठ्या उत्सुकतेने तो उघडतो, पण तो बहुधा कंपनीचा जाहिरातीचा संदेश निघतो. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे.
सरकारचे आश्वासन केवळ आश्वासनच ठरले आहे की प्रशासनाची कुठेतरी गडबड झाली आहे, हेच समजेनासे झाले आहे. सुखापुरी मंडळातील कुक्कडगांवसह परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचे अनुदान जमा करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.