Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादमोहोळ (कथा)

मोहोळ (कथा)

मोहोळ (कथा)

संध्याकाळची वेळ होती , रामू लगबगीन रस्ता तुडवित गावाकडे निघाला होता.ढगाळ वातावरण असल्याने गडद अंधार लवकरच पडला होता .तसाच तो गडबडिने घरी पोहोचला. घर एक पडकी झोपडी होती . पाऊस थेंब थेंब करत यायला सुरुवात झाली.तसा रामू परेशान झाला .त्याला आज त्याच्या झोपडीवर गळणाऱ्या जागी पाचट टाकून तिची मरम्मद करायची होती .पण नात्यातील कुणीतरी मरण पावल्या मुळे तो त्याच्या अंत्यविधीसाठी गावाला गेला होता.
रामू ने अंघोळ करून लगेच झोपडी ची मरम्मद करू लागला.त्याची छोटी छोटी दोन मुले तशीच एका कोपऱ्यात झोपी गेली होती.त्याची बायको रमणी त्याला मदत करत होती .रामूने पाचट गोळा करून घेतल होतं. तसाच तो झोपडी वर चढला अन रमणी त्याला खालून पाचट देत होती .रामूने साऱ्या झोपडी ची पूर्ण मरम्मद केली अन तो खाली उतरून तसाच आडवा झाला.
बाजूला बसून रमणी त्याला म्हणत होती . ” नकर दोन घास खाऊन घ्या धनी “. रामू काहीच बोलेना ..तो विचारात होता त्याच्या ..
उद्या आपली चुल कशी पेटल,आपली दोन्ही लेकर अन बायको कशी पोटभर अन्न खाऊ शकतील …
रमणी ने त्याला हलवत विचारल ” काय झाल धनी कनच्या ईचरात हायसी … आजच भागलं न बघुया उद्याच उद्या ,काले तुमी परेशान होता अन मी हाय ना व सोबतीला ..व्हय होईल समद ठीक ..देव आपली परीक्षा घेतोय ..त्यात आपल्याले खर उतरायचं हाय ..जाऊ द्या ..आता लई ईचार करू नका ..दोन घास खाऊन घ्या अन पडा आडवं ” .तसा रामू होकारार्थी मान हलवून जेवण करतो अन तसाच बाजूला आडवा पडतो ..
कोंबड्यानं बाक दिली अन तांबडं फुटण्याच्या मार्गांवर होतं. तसा रामू जागा झाला अन डोळ्यावर पाणी मारत आपल्याच अंगावरच्या कपड्याने पुसत होता.मग बाजूलाच पडलेली कुऱ्हाड त्याने उचलली आणि तो घराबाहेर पडला.मनाशीच काहीबाही बोलत तो चालत होता.गावाच्या शेजारीच एक घनदाट जंगल होतं. तो आता जंगलात शिरला होता.मोराचा आवाज कानी निनादत होता.जंगलातली शांतता त्याला जाणवत होती.जंगलात ना-ना प्रकारची झाडे होती.तो एखादं वाळलेलं झाड नाहीतर खोड शोधत होता .तसा तो सैरावैरा नजरेनं शोधू लागला.काही अंतरावर गेल्यानंतर त्याला एक वाळलेलं झाड त्याच्या नजरेस पडलं. तसा तो लगबगीनं त्या झाडाजवळ गेला.झाड तसं पार वाळून गेलं होतं.रामू त्या झाडावर कुऱ्हाडीने घाव घालू लागला.झाड काही उंच नव्हतं,आखूड अन छोटसं होतं. रामुने ते झाड बुडापासून तोडलं.मग त्या झाडाच्या फांद्या तोडून सर्वांचे बारीक बारीक तुकडे केले अन त्याचा भारा तयार केला.त्याला थोडा थकवा जाणवत होता.तसा तो विश्रांती घेण्यासाठी खाली बसतो.त्याक्षणी त्याला शेजारच्या बाभळीच्या झाडावरील मोहोळाकडे जाते.रामू पटकन उठतो अन त्या झाडावर जाण्याचा प्रयत्न करतो,वरवर चढू लागतो.चढताना त्याच्या हाताला, पायाला काटे टोचत होते.एक काटा तर पायात टोचला अगदी रुतून बसला,तरीही रामू मोठ्या धीरानं मोहोळापर्यंत पोहचला.मोहोळ एका छोट्या फांदीवर होतं. रामू त्या फांदीजवळ हात नेण्याचा प्रयत्न करत होता.थोड्याबहुत कष्टाने मोहोळापर्यंत हात नेतो अन ताडकन ती फांदी ओढतो.फांदी चिकट होती,तुटता तुटत नव्हती.रामू तिला खाली-वर,खाली-वर करून तोडत होता.तोवर मोहोळाच्या मधमाश्या सावध झाल्या.काही खाली पडल्या अन परत उडत वर आल्या आणि मोहोळाजवळ घोंगावू लागल्या.त्यातल्या काही तर रामुला आपल्या विषरी काट्याने डंख मारत होत्या.रामुने मग जोरात त्या फांदीला हिसका मारला अन ती फांदी तुटली.पण बाजूच्या फांदीचे काटे त्याच्या हातात टोचले ,अन त्यातून भळाभळा रक्त येऊ लागलं,हात तर खूप दुखत होता.तरीही रामू वाट मिळेल तिकडून खाली उतरू लागला अन आजूबाजूच्या फांदीचे काटेही त्याला तोचत होते.तो तसाच खाली उतरला.मोहोळाची फांदी हातात धरून तो तोडून जमा केलेल्या लाकडा पर्यंत चालत गेला.हातात रुतलेल्या काट्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या.त्याने मोहोळ हळूच त्या लाकडाच्या वर ठेवलं अन हातात रुतून राहिलेला काटा त्याने ओढून काढला..रक्त काही करता थांबत नव्हतं,मग रामुने खालची थोडी माती उचलली अन लावली त्या हातावर..लाकडं तर तोडून जमा केली होती पण भारा कशाने बांधणार,तो आजूबाजूला पाहू लागला,त्याला एका झाडावर चढत गेलेला वेल दिसला. जवळची कुऱ्हाड घेऊन तो त्या वेलाला तोडून आणतो आणि भारा बांधतो.
सूर्य हळू हळू वर डोकं काढत होता अन अंधाराला दूर सारत तो प्रकाश पसरवत होता.रामुने आपली कुऱ्हाड त्या भाऱ्यात खोसली, अन भारा डोक्यावर उचलून घेतला.मोहोळ एका हातात घेवुन ,एका हाताने भाऱ्याला धरत तो गावची वाट चालत होता.झपझप पावलं टाकत तो पायवाटेनं गावात पोहोचला.डोळ्यावरचा भारा आता जड वाटत होता तरीही तो उरलेल्या ताकतीनिशी तसाच टोक्यावर घेऊन चालत होता.हात गळून आला की मोहोळाची फांदी तोंडात धरायचा अन दुसऱ्या हाताने भारा धरायचा ,अस करत तो गावात आला होता.
रामुला धनु सावकारानं काल सरपण आणाय सांगितलं होतं.म्हणून तो थेट धनु सावकाराच्या घरी जाऊन थांबतो.रामुने आवाज दिला ,,
”सावकार अव सावकार “,,
दोन चार हाका ऐकल्यावर सावकाराची बायको बाहेर येते अन रामूला बोलू लागते,
‘”रामू आणलास का सरपण ,बर केलंस बाबा लवकर आणलस,आज चूल पेटवाय सरपणच नव्हतं बघ,,हितं टाक भारा “,,
तसा रामू भारा खाली टाकतो.
रामुच्या हातातलं मोहोळ पाहून सावकारीन रामुला म्हणते,,
” रामू हे मोहोळ आमच्या पिंटूला दे बर ”
रामू : पर मालकीण मी हे माज्या लेकराय साठी आणलं हुत,, घरी दाणा नाय ,लेकरं उपाशी हाईत माजी,,’
सावकारीन : ‘आर पर मी चार पैसे देते की त्याचं ,सरपणाचे अन मोहोळाचे मिळून जास्त पैसे होतील ,अन थोडे तांदूळ बी देईल,,’
(रामुला डोळ्यासमोर लेकरं दिसत होती,मोहोळाने काय होणार,,,तांदूळ नेले तर आजचा दिवसाच भागल तरी,,अन पैसे बी उरतील,,)
रामुला शेवटी पैसे अन तांदुळापायी होकार भरावा लागला,,
सावकारीन मोहोळ घेऊन घरात गेली अन एका पिशवीत तांदूळ टाकून आणले ,सरपणाचे अन मोहोळाचे पैसे बी रामुला दिले.तसा रामू खुश झाला,अन गडबडीत घराचा रस्ता धरून चालू लागतो.
इकडे घरी रमणीने झोपडीतला सारा आवार पांढऱ्या मातीनं अन शेणाने सारवून घेतला होता.अंगणात शेणाचा सडा शिंपडला होता.दोन्ही लेकरं उठून तोंड धुवत होती,,रमणी दारात बसून लेकराकडे पाहत बसली होती,आपल्याच विचारात मग्न होती..आज लेकरायला काई खायला मिळतं की नाई म्हणून ती चिंतातुर होती….तेवढ्यात लेकरं बाबा आले,बाबा आले म्हणत रामूकडे पळत जातात..रमणी भानावर येते,,अन उभी राहते.
रामू तांदूळ घेऊन घरात येतो अन रमणीला म्हणतो,,
‘रमणी आज लेकरायले खायला मस्त भात वरण कर बरं ..
आज रामू आणि रमणी दोघेही खुश होते कारण आजच्या दिवसाचं त्यांचं अन लेकरांच भागलं होतं अन थोडेबहुत पैसेही मिळाले होते ,एवढ्यावरच ते समाधानी होते…
-विजय नारायण वाठोरे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments