मतदार याद्यांतील त्रुटी दूर करून हरकती व दावे दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी
– भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना/प्रतिनिधी/ जालना शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ करिता प्रसिद्ध झालेल्या १६ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्याने दुरुस्ती व हरकती, दावे दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी आमदार कैलासजी गोरंटयाल व भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या वतीने जालना महानगराच्या वतीने जिल्हाधिकारी, जालना व आयुक्त, जालना शहर महानगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे आज करण्यात आली.
भास्कर आबा दानवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना महानगरपालिकेतील सर्व १६ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांची प्रभागनिहाय व घरक्रमांकनिहाय पुनरपडताळणी करावी, प्रभागाबाहेरील व्यक्तींची नावे त्वरित सदर प्रभाग याद्यांतून वगळावीत व प्रत्यक्ष वास्तव्यास असलेल्या प्रभागात त्यांची नावे समाविष्ट करावीत. मतदार पडताळणी प्रक्रियेत बी.एल.ओ. यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन आधार दस्तऐवजांच्या आधारे शहानिशा करावी, आवश्यक पुरावे सादर केल्यास पात्र व्यक्तींची नावे नवीन मतदार म्हणून समाविष्ट करण्यात यावीत, मयत झालेल्या मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात यावीत, पुनरपडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सुधारित मतदार यादी प्रकाशित करावी, तसेच हरकती व दावे दाखल करण्यासाठी निश्चित मुदतवाढ देण्यात यावी.
