Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादराजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व मनोहर जोशी 

राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व मनोहर जोशी 

राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व मनोहर जोशी
        राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची आज जयंती. अत्यंत गरीब कुटुंबात  २ डिसेंबर १९३७ रोजी जन्मलेले मनोहर जोशी यांचा शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे १९६७ साली मनोहर जोशींनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीचे ते नेते होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत साथीदार होते म्हणूनच १९९५ साली शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर बाळासाहेबांनी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले. १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्षपदही मिळाले. १९९९ ते २००२ या याकाळात ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते तर २००२ ते २००४ या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राच्या राजकारणात पाच दशकांहून अधिक काळ राहूनही त्यांचा कोणाशी वाद झाला नाही. त्यांच्या मितभाषी व प्रेमळ स्वभावाने  त्यांनी सर्वांची मने जिंकली.  विरोधी पक्षातही त्यांच्या विषयी आदराची भावना होती म्हणूनच त्यांना राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असे म्हंटले जाते. राजकारणा प्रमाणे व्यवसायातही त्यांनी यश मिळवले. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना प्रशिक्षित करून  रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. मनोहर जोशी यांनी काही पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेले शिवसेना काल – आज – उद्या हे पुस्तक म्हणजे शिवसेनेचे चरित्र लेखन आहे. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या ५० वर्षाच्या चढ उताराचे साक्षीदार होते. १९६७ साली शिवसेनेत प्रवेश केलेले मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. शिवसेना हाच त्यांचा श्वास, शिवसेना हाच त्याचा प्राण आणि बाळासाहेब हेच त्यांचे एकमेव दैवत होते. बाळासाहेब त्यांना पंत म्हणून संबोधत. मागील वर्षी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला एक कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला. राजकारणात असूनही सर्वांशी मैत्रीचे संबंध असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व मनोहर जोशी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
-श्याम ठाणेदार 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments