अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम
अत्याचारात मृत्यू प्रकरणी मृताच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय;
जिल्ह्यात ३१ प्रकरणात पात्र वारसांना दस्ताऐवज दाखल करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणात मृत्यू झाला असल्यास मयताच्या पात्र वारसाला नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय दि.२० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे. सन २०१२ ते २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील ३१ प्रकरणात मयतांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून मयताच्या वारसांनी सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार सन २०१२ ते २०२५ याकालावधीतील पिडीत मयतांच्या वारसांना नोकरी देण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकून ३१ प्रकरणात पिडीत व्यक्तिंचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या ३१ प्रकरणातील मृतांच्या वारसांनी सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल जवळ, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार परिशिष्ट १ ते ६ मध्ये नमूद दस्तऐवजांसह वारसांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी केले आहे.
