जितेंद्र अग्रवाल यांचा १०० किमी धावण्याचा विक्रम; व्यापारी महासंघातर्फे भव्य सत्कार
जालना/प्रतिनिधी/ राजस्थानमधील जयसलमेर येथे आयोजित १०० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत जालना येथील व्यापारी जितेंद्र अग्रवाल यांनी अवघ्या १३ तास ५४ मिनिटांत शंभर किलोमीटर अंतर पूर्ण करून उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जालना जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने विजय विलास येथील बँक्वेट हॉलमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. १९७१ च्या भारत–पाकिस्तान युद्धात राजस्थानमधील लोंगेवाला चौकी येथे भारतीय सैन्याच्या १२० जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याच्या सन्मानार्थ दरवर्षी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. देशभरातून नामांकित धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षीच्या स्पर्धेत जालना येथील व्यापारी जितेंद्र अग्रवाल यांनी सहभाग घेत विक्रमी कामगिरी करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सत्कार समारंभात बोलताना जितेंद्र अग्रवाल यांनी १०० किलोमीटर अंतर धावण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा आणि तयारीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी व्यापारी वर्गाला चालणे व धावणे याबाबत उपयुक्त टिप्स देत नियमित व्यायाम, धावण्याचे महत्त्व, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यावर भर दिला. धावण्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो, असे त्यांनी नमूद केले. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते, याची जाणीवही त्यांनी करून दिली. शेवटी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हा संदेश देत सर्वांना नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे महानगर प्रमुख भास्कर आबा दानवे, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे महासचिव शाम लोया, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, महासचिव संजय दाड, विनोद कुमावत, सुभाष देवीदान, इंद्रचंद तवरावाला, अर्जुन गेही, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, विनोद पवार, राजेश कामड, लक्ष्मीनारायण मानधना, विजय बगडिया, मोहन इंगले, प्रमोद गंडाल, क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, चेतन मराठे, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष पंकज कासलीवाल, संजय अग्रवाल, योगेश पाटनी, वासुदेव देवडे, योगेश ठक्कर, दिलीप अग्रवाल, राजू सेठ जैन, पवन करवा, सुशील मेहरा, अच्युतराव कदम, इमरान भाई यांच्यासह जालना शहरातील मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.
