गंगापूर दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा वाढता हस्तक्षेप सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी
गंगापूर/प्रतिनिधी/ गंगापूर शहरातील दुय्यम निबंधक (दस्त नोंदणी) कार्यालयात सध्या अव्यवस्थेचे चित्र निर्माण झाले असून, दलालांचा वाढता हस्तक्षेप सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असून, कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक दस्त नोंदणीसाठी गंगापूर येथे येतात. मात्र, प्रक्रियेची सविस्तर माहिती नसल्याचा गैरफायदा घेत काही दलालांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे. संबंधित दलाल काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून काम लवकर करून देण्याच्या नावाखाली जादा पैसे उकळत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नागरिकांना विनाकारण अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा आवश्यक कागदपत्रे असूनही काम वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांची आर्थिक लूट व मानसिक नुकसान होत आहे. परिणामी, कार्यालयातील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या सर्व प्रकारांबाबत संतप्त नागरिकांकडून संबंधित दलालांसह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच दस्त नोंदणी प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि दलालमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
