अवैध वृक्षतोडीमुळे गंगापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ अवैध वृक्षतोडीमुळे गंगापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने इलेक्ट्रॉनिक कटर मशीनचा वापर करून अवैध वृक्षतोडीचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. वाळलेल्या झाडांच्या नावाखाली हिरवीगार झाडांची कत्तल वातावरण बदलासाठी कारणीभूत ठरत आहे.
परिणामी वनसंपदेसह वन्यजीवांचाही ऱ्हास होत असल्याची चिंता वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
जंगलातून सर्वाधिक वृक्षतोड होत आहे. अत्याधुनिक धारदार इलेक्ट्रॉनिक शस्त्राचा वापर करून पाच मिनिटांत एक महाकाय झाड जमीनदोस्त करून पुरावा नष्ट केला जात आहे. वृक्षतोड अशीच सुरू राहिली तर या चार वर्षांच्या काळात वनसंपदा पूर्णपणे नष्ट होण्याचा अंदाज वन्यप्रेमी बांधला आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल का? शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध वृक्षांची लागवड केली जाते. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश दिला जातो. त्यावर लाखो रुपये खर्च होतात. दुसरीकडे मात्र सर्रास हिरव्या डेरेदार झाडांची अवैध वृक्षतोड होताना दिसते. मग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? जे सामान्य नागरिकांच्या नजरेस पडते ते प्रशासनाला दिसत नाही का? गंगापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्रात इन कॅमेरा पाहणी करावी व लाकूडमाफियांना अभय देणाऱ्या वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.