Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादफौजदारी कारवाईच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत ताळ्यावर आले भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ...

फौजदारी कारवाईच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत ताळ्यावर आले भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

फौजदारी कारवाईच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत ताळ्यावर आले

भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

      इराण इस्रायल युद्धाच्या काळात भारतात काल पर्यंत गॅस, इंधन टंचाई, लॉक डाऊन लावणार अशा खोट्यानाट्या अफवा पेरून अराजक माजवण्याचा कट राऊत आणि विरोधक रचत होते. या कठीण प्रसंगात खोट्या अफवा पसरवणा-यांवर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येईल असा कारवाईचा बडगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उगारल्यानंतर संजय राऊतांचे डोके अचानक ठिकाणावर आले आहे. आज राऊतांनी अचानक घूमजाव केले आणि इराणमुळे देशात इंधन पुरवठा सुरळीत असल्याची कबुली दिल्याचा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेची ‘टीम इंडिया’ ही भारतीयांच्या विकासासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज आहे. संजय राऊत आणि उबाठा गटाचा संघ मात्र पाकधार्जिणी भूमिका घेत ‘टीम पाकिस्तान’ म्हणून सदैव भारतविरोधी आणि देशाच्या विकासासाठी झटणा-या पंतप्रधान मोदी यांच्या टीम इंडीया विरोधात कटकारस्थान करत युद्ध लढतो अशी घणाघाती टीका श्री. बन यांनी केली.

इराण इस्त्रायल युद्धाच्या काळात अनेक देश संकटात असताना, महागाईने कळस गाठला असताना, इंधन आणि गॅस पुरवठा खंडित असताना भारतात मात्र त्याची झळ बसली नाही. पंतप्रधान मोदींच्या समर्थ नेतृत्वामुळेच हे शक्य झाल्याचे श्री. बन यांनी अधोरेखित केले. तसेच या युद्धाच्या काळात देखील घाणेरडे राजकारण करत राऊत, उबाठा गट, विरोधक सातत्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार खंबीरपणे राज्याच्या सुरक्षेसाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी झटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भोंदूबाबा खरातला पाठीशी घालून त्याच्या आश्रमाला शेतक-यांच्या हक्काचे पाणी वळवण्याचा शासन आदेश ज्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला त्यांना याप्रकरणी बोलण्याचा कदापि अधिकार नाही असे श्री. बन यांनी राऊतांना खडसावले. आश्रमाला पाणी देण्याचा आदेश निघाला तेव्हा राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख होते आणि जे 40 आमदार खरात भोंदूबाबाच्या आश्रमात जात होते त्यामध्ये मिलिंद नार्वेकर देखील होते याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले.

नाहक खोट्या बातम्या पसरवून जातीधर्मात दरी निर्माण करण्याचे काम करणा-या राऊतांना आणि विरोधकांना श्री.बन यांनी खडे बोल सुनावले. या युद्धाच्या काळात भेदभाव न करता सर्व धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे त्यामुळे राऊत आणि विरोधकांनी नाहक जाती धर्मात वाद निर्माण करू नये. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार कुठल्याही भेदभावा विरहित जशा विकासाच्या योजना तळागाळात गरजूंपर्यंत पोहोचत आहेत तसेच आत्ताच्या काळात केंद्र सरकार जनतेला दिलासा देण्याचे काम करत असल्याचेही ते म्हणाले.

-गोविंद येतयेकर

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments