विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प – भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना/प्रतिनिधी/ शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.
लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल.
मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरासाठी वाढीसाठी होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2026) देशाचा अर्थसंकल्प सादर करत विकास, उद्योग आणि आत्मनिर्भरतेवर भर दिला. या बजेटमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन, औषधनिर्मिती व बायोफार्मा क्षेत्राला चालना, सेमीकंडक्टरसाठी मोठी तरतूद, तसेच केमिकल पार्क आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कॅन्सर (कर्करोग) आणि मधुमेहाची (Diabetes) औषधे स्वस्त करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या जीवनरक्षक औषधांवरील कर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामुळे सामान्य नागरीकांना यांचा खुप उपयोग होणार आहे, असे मत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी व्यक्त केले.
