Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादप्रवीण बागड़े यांना प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार जाहीर

प्रवीण बागड़े यांना प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार जाहीर

प्रवीण बागड़े यांना प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार जाहीर

नागपूर/ साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा जागृत ठेवणाऱ्या आणि विचारांची नवी दिशा देणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा ‘प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार’ यंदा नागपूरचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बागडे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी लेखनामुळे हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे. प्रवीण बागडे हे गेली अनेक वर्षे मराठी साहित्य क्षेत्रात सक्रिय आहेत. वृत्तपत्रीय संपादकीय, सामाजिक जाणीव जागवणारे लेख, निवडणूक प्रक्रियेतले वास्तव, धार्मिक-सांस्कृतिक घडामोडींवरील संपादकीय शैलीतील विवेचन अशा विविध माध्यमांतून त्यांनी मराठी वाचकवर्गाला विचारप्रवण साहित्य दिले आहे. त्यांच्या लेखनशैलीत वास्तवाशी प्रामाणिकपणा, मुद्देसूद मांडणी आणि जनसामान्यांच्या समस्यांवरील स्पष्ट दृष्टिकोन यांचा समन्वय दिसून येतो.

साहित्य रत्न पुरस्कारासोबत मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रकमेचा समावेश आहे. आंबेडकरी चळवळीचा आवाज दैनिक प्रबुद्ध परिवार, नांदेड वृत्तपत्राचा १६ व्या वर्धापन दिनी होणाऱ्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रवीण बागडे यांना प्रदान करण्यात येणार असून साहित्यविश्वात आणि वाचकवर्गात त्यांच्या सन्मानाबद्दल उत्साहाचे वातावरण आहे. या घोषणेनंतर नागपूरसह विदर्भातील साहित्यिक वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या लेखनाला “सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारे” असे संबोधले आहे. तसेच प्रबुद्ध साहित्य रत्न पुरस्कार प्रवीण बागडे यांना मिळाल्याने मराठी साहित्य क्षेत्राचा गौरव वाढल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

यापूर्वी सुध्दा विद्यापीठात त्यांच्या उल्लेखनीय कार्य, उत्साह आणि निष्ठेसाठी ‘उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’, ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’, राज्य शासनाचा अहवाल तयार करणेकरीता सक्रिय सहभागासाठी ‘लम्पी योद्धा पुरस्कार’ आणि नुकतेच देशभर राबविण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अभियानाचा विद्यापीठ अहवाल तयार करणेकरीता सक्रिय सहभागासाठी ‘विकसित कृषी संकल्प अभियान २०२५’
पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या लागोपाठ यशस्वी प्रयत्नांचे फार कौतुक केले जाते. ते महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक म्हणुन कार्यरत होते. शासन आणि प्रशासनाच्या अनुभवासोबतच त्यांना समाजसेवा आणि साहित्याचीही आवड आहे. त्यांनी कोविड अंतर्गत अनेक रुग्णांची सेवा सुध्दा केली आहे. तसेच त्यांचे महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर ३५० वर लेख तसेच १०० वर मुलाखती/स्तंभ सुध्दा प्रकाशित झाले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेक स्तरावरून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments