ग्रामपंचयात विभागाचे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”
छत्रपती संभाजीनगर – ग्रामविकास विभागातर्फे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राज्यात राबविण्यात येणार आहे. हे आर्थिक वर्ष 2025-26 पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच महसूल व राज्य स्तर या चार स्तरांवर राबवले जाणार असून, यासाठी 290 कोटी 33 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 असा आहे . राज्यात एकूण 1902 पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींसाठी राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाला 5 कोटी, द्वितीय क्रमांकाला 3 कोटी तर तृतीय क्रमांकाला 2 कोटी रुपये मिळणार आहेत. विभागस्तरावर 18 ग्रामपंचायतींना प्रथम पुरस्कार 1 कोटी, द्वितीय 80 लाख व तृतीय 60 लाख रुपये असे पुरस्कार देण्यात येतील. तालुकास्तरावर 1053 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 15, 12 व 8 लाखांचे पारितोषिक तर 702 विशेष पुरस्कार 5 लाख रुपयांचे असतील.पंचायत समित्यांसाठी राज्यस्तरावर 2 कोटी, दीड कोटी व 1 कोटी 25 लाख तर विभागस्तरावर 1 कोटी, 75 लाख व 60 लाख रुपये असे पुरस्कार ठरविण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेसाठी राज्यस्तरावर अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी व 2 कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.अभियानाची पूर्वतयारी 1 ऑगस्टपासून सुरू झाली असून अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर समित्या स्थापन केल्या जातील.या अभियानात 7 मुख्य घटकांचा समावेश आहे .त्यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची सांगड, गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदान यांचा समावेश आहे. या निकषांवर आधारित गुणांकनानंतरच पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
