ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी;
लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर – राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल २०२५ पासून ऑपरेशन प्रहार राबविले आहे. त्याअंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व बेकायदा ढाबा चालकांविरुद्ध केलेल्या कारवाईत ४७५ गुन्हे दाखल केले. ८४४ आरोपींना अटक केली. २८ लाख ८ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत २६ खटल्यांची सुनावणी झाली. १२२ आरोपी दोषी ठरले व त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे.
अवैध मद्यविक्री आणि बेकायदा ढाब्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग एप्रिल २०१५ पासून ऑपरेशन प्रहार राबवित आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४७५ गुन्हे दाखल केले. ८४४ जणांना अटक करण्यात आली आणि २८ लाख ८ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा विधी सेवा केंद्रामार्फत दि.१३ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६८ आणि ८४ अंतर्गत २६ खटल्यांचा निकाल लागला त्यात १२२ जणांवर दोष सिद्ध झाला. त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.दोषसिद्धी मध्ये जिल्ह्याची ही आघाडी आहे.
परवानाधारक ठिकाणांव्यतिरिक्त अवैध मद्यविक्री, त्यास बेकायदा जागा पुरविणे, मद्यपान करणे अशा गैरप्रकारांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई केली जाईल,असेही अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.
